कर्जत ( गणेश पवार ) : अनंत चतुर्दशी निमित्त कर्जत तालुक्यात गणेश विसर्जन होत असताना त्याला गालबोट लागलं आहे. तालुक्यातील चांधई येथे उल्हास नदीत गणेश विसर्जन करताना चौघे बुडाल्याची घडल्याची घटना घडली आहे. त्यातील एकाला वाचवण्यात यश आले तर दुसऱ्याचा मृत्यू झाला असून अजूनही दोघे बेपत्ता आहेत. दरम्यान अपघातग्रस्तांचा मदतीसाठी बचाव पथकाने रात्री ९ पर्यंत बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार पडल्याने त्याला यश आले नाही तसेच ही शोध मोहीम उद्या सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील उक्रुल ग्रामपंचायत हद्दीत मॅपल ग्रीन येथे राहणारे तसेच मूळचे सोलापूर येथील चेतन सोनवणे कुटुंब यांच्या घरी १० दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता. तर आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने गणेश विसर्जनासाठी चेतन सोनवणे यांच्या घरी पुण्याहून त्याचा मित्र यश साहू व त्याचे वडील जगदीश साहू हे देखील पाहुणे म्हणून आले होते. सायंकाळी चेतन सोनवणे, मित्र यश साहू, यशचे वडील जगदीश साहू, चेतन याची आई बहिणी, व शेजारी असलेले जेना कुटुंब हे चांधई येथील उल्हास नदीवरील पुलाजवळ गणेश विसर्जनासाठी गेले. आभाळात पाऊस दाटला होता.
मात्र उघड असल्याने त्यांनी लवकर विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते साधारण ४ वाजता घरातून बाहेर पडले. चांधई येथील उल्हास नदीच्या पुलाजवळ गणेश विसर्जन करताना चेतन सोनवणे, यश साहू, जगदीश साहू, रोहन रंजन जेना वय १२ यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी रोहन चे वडील यांनी पाण्यात उडी मारत त्याला बाहेर काढले तोवर हे तिघे दिसेनासे झाले. दरम्यान चेतनच्या घरच्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे नदीवर उपस्थित असलेल्या स्थानिकांपैकी काही मुलांनी बचाव करण्यासाठी नदीत उडी मारली. मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. त्यातच त्यांना यश साहू मिळून आला त्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आले.
मात्र तो हालचाल करत नसल्याने त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी प्रयत्न करून देखील तो हालचाल करत नसल्याने त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान चेतन सोनावणे व जगदीश साहू हे बेपत्ता असल्याने तत्काळ कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली. तर खोपोली येथील अपघातग्रस्तांचा मदतीसाठी बचाव पथकाला देखील पाचारण करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पथकासह घटनास्थळी उपस्थित झाले. तर काहीच वेळच बचाव पथक देखील पोहचल्याने त्यांनी व्यूह रचना आखत तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र बचाव पथकाच्या गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल ठकेकर, हनीफ करंजीकर, वैभव नाईक यांनी रात्री ९ वाजेपर्यंत शोध घेऊनही दोघे सापडून आले नाहीत. त्यात अंधार आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने रेस्क्यु ऑपरेशन आजपुरते थांबवण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बेपत्ता असल्येलांचा शोध बचाव पथक घेणार आहे.
यावेळी कर्जत तालुक्याचे तहसिलदार डॉ. शीतल रसाळ, पोलिस उपविभागीय अधिकारी विजय लगारे, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, योगेश थोरवे, संतोष कोळंबे, संतोष थोरवे यांनी देखील घटनास्थळी भेट देत माहिती घेतली तर ही दुर्दैवी घटना घडलेल्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे संत्वन केले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.