दि. १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील ठाकूरवाडी गावाजवळ, मुंबई-पुणे डाऊन रेल्वे रुळाच्या शेजारी एक पिंक रंगाच्या ट्रॉलीबॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.
पुणे लोहमार्ग महिला पोलीस हवालदार छाया चव्हाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत महिलेचे वय अंदाजे २८ ते ३२ वर्षे असून, तिचे नाव व पत्ता अज्ञात होते. मृतदेहाची परिस्थिती पाहता खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रॉलीबॅगमध्ये ठेवून रेल्वेतून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे, तसेच कर्जत विभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यांनी संयुक्त तपास पथक तयार केले.
२००-२५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना लोकमान्य टिळक टर्मिनस येथील कॅमेऱ्यात पिंक रंगाची ट्रॉलीबॅग घेऊन जाणारा एक संशयित दिसून आला. पुढील तपासात, १५ एप्रिल रोजी रात्री १०:१७ वाजता मुंबई कोइंबतूर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये एक महिला आणि एक पुरुष प्रवास करताना दिसले.
रेल्वेच्या रिझर्वेशन डेटा आणि मोबाईल नंबरच्या आधारावर बेंगळुरूहून दोघे प्रवासी असल्याचे निष्पन्न झाले. बेंगळुरू स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रॉलीबॅग न दिसल्याने अधिक संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून, दि. १६ मे २०२५ रोजी दोघांना बेंगळुरूहून अटक केली.
मृत महिलेला ओळख पटली असून तिचं नाव धनलक्ष्मी एराप्पा रेड्डी ऊर्फ बिंदू (वय ३४, रा. रापताडू, आंध्रप्रदेश) आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे व्हि. विजयकुमार व्यंकटेश (वय २६, चित्तूर) आणि टी. यशस्विनी राजा (वय २४, तिरुपती) अशी आहेत. दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या तपासात कर्जत व नेरळ पोलीस ठाण्याच्या पथकांनी अत्यंत चिकाटीने काम केल्याबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड करीत आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.