ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल करून पोलीस प्रशासनाने दिला जनतेला सतर्कतेचा इशारा

Mocdrill uran
उरण (विठ्ठल ममताबादे ) :
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या   पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. तसेच भारतातील अति महत्वाच्या १६ ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहे. त्या १६ ठिकाणापैकी महाराष्ट्रातील मुंबई, तारापूर, उरण या महत्वाच्या शहराचे नावे पहिल्या यादीत आहेत. यावरून या शहराचे महत्व अधोरेखित होत आहे. या ठिकाणी सायरन वाजवून मॉक ड्रिल घेण्यात आले.
 केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले होते.या मॉक ड्रिलच्या दरम्यान  दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला.उरण शहरातील  तहसिल कार्यालय उरण, ओएनजीसी कॉलनी,ग्रुप ग्रामपंचायत चाणजे, जिटीपीएस कंपनी बोकडविरा, बारमर लॉरी, भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी कोप्रोली, बल्क गेट कंपनी मोरा या ठिकाणी सायरन वाजविण्यात आले. तर एन.आय. स्कूल, पंचायत समिती, उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल झाली.नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्रीय गृह विभागाच्या सूचनेनुसार उरण शहरात ब्लॅक-आऊट प्रकियेचीची रंगीत तालीम दि ७ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता  घेण्यात आली असून त्यादरम्यान उरण शहरातील विद्युत पुरवठा १० मिनिटांसाठी खंडित केला गेला. त्यादरम्यान नागरिकांनी घरातील इन्व्हर्टर, जनरेटर व प्रकाश निर्माण करणारी रिचार्जेबल उपकरणे आदी वस्तूंचा वापर करणे टाळले. यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनास सहकार्य केले आहे. मॉक ड्रिलचे उरण मध्ये सर्वत्र स्वागत करण्यात आले असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उरण शहरात एन आय हायस्कूल येथे दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल करण्यात आले यावेळी खासदार धैर्यशील पाटील,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी,न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ विशाल नेहूल,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक समीर जाधव, तहसीलदार उद्धव कदम,मोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे, इंडियन आर्मीचे अधिकारी सन्नी राणा,एनसीसी चे ट्रेनिंग ऑफिसर संजय पाटील, कॅप्टन आर एस जमनुके, फायर ब्रिगेड चे अधिकारी कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
========================================
उरण शहराची निवड का करण्यात आली –
उरण हे समुद्र किनारी वसलेले शहर असून औद्योगिक दृष्टीने हा शहर महत्वाचा आहे. काही वर्षांपूर्वी समुद्र मार्गे दहशतवादी आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आताही दहशतवादी समुद्र मार्गे मुंबई, तारापूर, उरण भागात येण्याची व हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उरण मध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. मोठे मोठे प्रकल्प आहेत. यामुळे उरणला दहशत वादयाकडून मोठया प्रमाणात धोका आहे. जागतिक दर्जाचे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर म्हणून जेएनपीटी बंदर प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात मोठे हे बंदर आहे. जागतिक व्यापाराची येथे मोठया प्रमाणात उलथा पालथ होते. उरण मध्ये ओएनजीसी, बीपीसीएल, जिटीपीएल असे अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यांच्याही सुरक्षिततेला मोठा धोका आहे.
इंडियन नेव्ही समुद्र किनारी कार्यरत असून येथे विविध शस्त्र, बॉम्ब गोळे, रॉकेट, स्फ़ोटक पदार्थ बनविले जातात.उरण मध्ये मोठे शस्त्राचे भांडार आहे. त्यामुळेही उरणला मोठा धोका आहे. तसेच अनेक मोठ मोठे प्रकल्प आहेत. त्यांनाही धोका आहे. उरण मध्ये सुंदर समुद्र किनारा असल्यामुळे बाहेरून पर्यटक मोठया प्रमाणात येतात. दळण वळणाच्या दृष्टीनेही उरण अत्यंत महत्वाचा आहे. सागरी मार्ग, रस्ते महामार्ग, रेल्वे मार्ग यांचे विस्तुत जाळे असल्याने उरण परिसरात मोठया प्रमाणात दळणवळण होते. प्रवाशांची संख्याही जास्त आहे.देश विदेशातून पर्यटक उरण मध्ये येतात त्यामुळे उरणची सुरक्षितता महत्वाची आहे.
========================================
ऑपरेशन सिंदूरला उरण मधील नागरिकांचे जाहीर समर्थन व पाठिंबा.
जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांना आपले जीव गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने बुधवार दिनांक ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री पाकव्याप्त कश्मीर मधील ९ दहशतवादी तळावर क्षेपणाशस्त्रे डागली. भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशन सिंदूर नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने केलेल्या या क्षेपणाशस्त्र हल्ल्यात २ लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या कारवाईत पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त कश्मीर मधील दहशतवादयांच्या तळांना  लक्ष्य करण्यात आले होते. त्याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्लाचा कट झाला व त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती.
ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीर मधील दहशतवाद्याच्या ९ ठिकाणी लक्ष्य केले . या कृत्याचे भारतीयांनी समर्थन केले असून भारताला दहशतवाद विरोधी कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. उरण मधील नागरिकांनीही दहशतवाद विरोधात लढण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा व समर्थन दिल्याचे चित्र उरण मध्ये पहावयास मिळाले.व्हाट्सअप फेसबुक ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून उरणकरांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तान मधील दहशतवाद्यांना  जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.
========================================
मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर 
पहलगाम दहशत हल्ल्याच्या पार्श्व भूमीवर उरण मध्ये आयोजित केलेल्या मॉर्क ड्रिलच्या पार्श्वभूमीवर उरण मधील सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोड वर होत्या. उरण मधील उरण नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय, उरण पोलीस स्टेशन, महसूल कार्यालये, सिडको कार्यालये, उरण मधील ग्रामपंचायत आदी महत्वाचे शासकीय कार्यालयांनी गृह मंत्रालय व जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत, जनतेत जनजागृती करत मॉर्क ड्रिल मध्ये सामील झाले. सर्वच शासकीय कार्यालयांनी मॉक ड्रिल बाबतीत पूर्ण पाठिंबा व जाहीर समर्थन केले असल्याचे दिसून आले.सर्वच शासकीय कार्यालये अलर्ट मोड असल्याचे यावेळी दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading