माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू होण्यासाठी आम्ही सुध्दा खारीचा वाटा उचलून वेळप्रसंगी विरोधकांच्या आवेशाला सामोरे गेलो आहोत. आम्ही गावापासून आणि दस्तुरी नाका
( टॅक्सी स्टँड) पासून जवळपास सहा ते सात किलोमीटर दूरवर रहात आहोत. इथे या ई रिक्षांची संख्या खूपच कमी असल्याने आम्हाला अनेकदा पायपीट सुध्दा करावी लागते. त्यामुळे या स्वतंत्र देशात आम्हाला मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत की नाही असा प्रश्न वन ट्री हिल विभागातील नागरिक उपस्थित करत आहेत.
गावातील बंगल्याचे माळी कामगार हे गावापासून खूपच दूरवर रहात आहेत त्यामुळे अनेकदा रुग्ण तसेच जेष्ठ नागरिक यांना ई रिक्षांची सेवा वेळेत उपलब्ध होत नाही. ई रिक्षा सुरू झाल्यामुळेच इथे पर्यटकांची संख्या कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून याच माध्यमातून सर्वाना उत्तम प्रकारे रोजगाराच्या संधी मिळत आहेत. परंतु या सेवेला एक वर्ष पूर्ण होऊन देखील ई रिक्षांच्या संख्येत अद्यापही वाढ करण्यात आलेली नाही. शासनाने याचा लवकरच सकारात्मक विचार करून स्थानिक तसेच पर्यटकांना वाहतुकीची सुविधा निर्माण होणेकामी ई रिक्षांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरू लागली आहे.
—————————————————
वन ट्री हील परिसरात 52 कुटुंबे राहतात त्यांना ई रिक्षाची सेवा सुभाष सावंत यांच्या दुकानाच्या अर्ध्या मार्गापर्यंतच दिली आहे. परंतु आम्हाला नेहमीच ई रीक्षांसाठी तासनतास वाट पहावी लागते. हे फारच अन्यायकारक आहे आमच्या येथून दस्तुरी नाका (टॅक्सी स्टँड ) सात किलोमीटर दूर आहे ई रिक्षाही विशेषतः ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व महिलांसाठी खूपच सोयीची आहे त्यामुळे राज्य सरकारने ई रिक्षांची संख्या वाढवावी जेणेकरून आमची पायपीट वाचू शकेल.
…कल्पना पाटील, निवृत्त माजी मुख्याध्यापिका,रहिवासी वन ट्री हिल विभाग
—————————————————
सध्या सनियंत्रण समितीने केवळ वीस ई रिक्षांना परवानगी दिली आहे. यातील पंधरा ई रिक्षा विद्यार्थ्यांना दिवसा सेवा देतात. तर अवघ्या पाच ई रिक्षांमधून माथेरानला दर रोज दीड ते दोन हजार पर्यटक येतात. मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक सुध्दा नियमितपणे प्रवास करत असतात. त्यातच काहीवेळा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तात्काळ ई रिक्षाची सेवा द्यावी लागते तर बऱ्याच वेळा काही ई रिक्षा सर्व्हिस साठी नेरळला न्याव्या लागतात.अशा परिस्थितीत सर्वांना वेळेत सेवा देणे अत्यंत जिकिरीचे बनलेले आहे. यावर ई रिक्षांची संख्या वाढवणे हाच एकमेव पर्याय दिसत आहे.
…सुनिल शिंदे, सचिव श्रमिक रिक्षा संघटना
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.