उरण मतदारसंघातील उमेदवार महेश बालदी यांनी आगरी समाजातील महिला आणि मुलींविषयी केलेल्या अपशब्द टिप्पणींमुळे आगरी समाजामध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेण येथे आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली.
“महिलांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. जर महेश बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागितली नाही, तर या निवडणुकीत आगरी समाज त्यांना योग्य ती शिक्षा करेल,” असा इशारा पाटील यांनी दिला. बालदी यांच्या वादग्रस्त विधानाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, चार नोव्हेंबर रोजी त्यांना याबाबत पत्र दिले होते, मात्र अद्याप त्यांनी माफी मागितली नाही.
“आमच्या खाण्या-पिण्यावरून, आमच्या आगरी भाषेवरून जर कोणी टीका करत असेल, तर आगरी समाज हे सहन करणार नाही. निवडणुकीत तुम्हाला आगरी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असेही पाटील यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी संघटनेचे खजिनदार पी.वाय. पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. पाटील यांनी समाजातील काही लोकांना उद्देशून म्हटले की, “स्वतःच्या फायद्यासाठी लाचारी पत्करू नका. समाजहिताला प्राधान्य द्या.”
आगरी समाजाच्या एकजुटीचा हा इशारा उरण मतदारसंघात मोठा राजकीय वादळ निर्माण करू शकतो.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.