
नवी दिल्ली :
लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात कोणत्याही पक्षाला बहुमतापर्यंत पोहोचता आलेले नाही. भाजप 240 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतापासून 32 जागा दूर आहे. यामुळे सत्ता स्थापनेसंदर्भात सस्पेंस निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजपला बहुमत मिळालेले नाही, काँग्रेस गेल्या 10 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. यामुळे आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवून कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल. अशा एकूण परिस्थितीत, सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे…
नितीश कुमार यांचे महत्वा अधिक वाढले
या निवडणुकीत एकूण 12 जागा मिळाल्याने नितीश कुमार यांचे महत्व अधिक वाढले आहे. मात्र, नितीश कुमार यांनी पलटी मारली आणि ते I.N.D.I.A. सोबत गेले, तरीही I.N.D.I.A. सरकार स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या 272 जागांपर्यंत पोहोचत नाही.
भाजपसाठी एकनाथ शिंदेही महत्वाचे –
नितीश यांच्या जाण्याने भाजपला नक्कीच धक्का बसेल. मात्र, इतर अनेक मित्रपक्षांच्या मदतीने ते सत्तेवर येऊ शकतात. भाजपला एकूण 240 जागा मिळाल्या आहेत. तर चंद्राबाबू नायडूंना 16 जागा मिळाल्या आहेत. या दोहोंची बेरीज केल्यास, आकडा 256 वर जातो. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेही 7 खासदार आहेत. अशा प्रकारे संख्या 263 होते. स्वत:ला मोदींचे हनुमान म्हणवून घेणाऱ्या चिराग पासवान यांच्याकडेही 5 खासदार आहेत.
यासह आकडा 268 वर पोहोचतो. तसेच, आंध्रच्या जनसेनेला 2, जयंत चौधरी यांच्या आरएलडीला दोन, अपना दल आणि अजित पवार यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यांसह हा आकडा 274 वर पोहोचतो. हा आकडा सरकार स्थापनेसाठी लागणाऱ्या मॅजिक फिगरपेक्षाही दोनने अधिक आहे.