रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या वादात मितेश जनार्दन पाटील (रा. गडब, पेण) याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रथमेश राजेश पाटील (रा. गडब, पेण) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या वादात ओमकार सुरेश भूकवार (साखर आक्षी, अलिबाग), विशाल विजयकुमार वंटे (रोहिदास नगर, अलिबाग), प्रथमेश शेखर घोडेकर (साखर आक्षी, अलिबाग), राज रमन जयगडकर (साखर आक्षी, अलिबाग), प्रमोद किशन साठविलकर (साखर आक्षी, अलिबाग) या पाच आरोपींना तासाभरात ताब्यात घेण्यात आले.
प्रकरणाचा तपशील
३० नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी मितेश पाटील आणि त्याचा मित्र प्रथमेश पाटील वरसोली येथील यात्रेला गेले होते. त्यानंतर अलिबाग मुख्य समुद्रकिनारी ते बिअर व बिर्याणी खाण्यासाठी बसले. त्याच ठिकाणी आरोपी दारू पीत बसले होते. मितेश व प्रथमेश यांनी बिअरची रिकामी बाटली फोडल्याने ओमकार भूकवार याने शिवीगाळ केली. मितेशने त्याला जाब विचारल्याने वाद विकोपाला गेला.
आरोपींनी बिअरच्या बाटल्यांनी व चाकूने मितेश व प्रथमेशवर हल्ला केला. मितेशवर गंभीर वार झाले असून त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मारामारीत ओमकार भूकवार यालाही जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
पोलिसांची तत्परता
घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी पथक तातडीने पाठवून एका तासात आरोपींना अटक केली. पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. पोलिसांच्या या तात्काळ कामगिरीचे कौतुक होत आहे.
या दुर्दैवी घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.