आळंदीतील संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी देशभरातील वारकरी आणि भक्तगण कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. रविवारपासूनच आळंदी नगरी “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात भक्तिमय वातावरणाने भरलेली आहे.
लाखोंच्या संख्येने भाविक दाखल
मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि ठाणे-रायगड-मुंबई परिसरातून हजारो दिंड्या आळंदीमध्ये दाखल झाल्या आहेत. भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा गजर, फुगड्या, आणि पारंपरिक अभंगांच्या सुरावटींनी इंद्रायणी काठ फुलून गेला आहे. भक्तांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि उत्साह ओसंडून वाहत आहे.
सोहळ्यातील मुख्य आकर्षण
मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी श्रीमाउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. बुधवारी द्वादशी निमित्त परंपरेने होणारा माउलींचा रथोत्सव यंदा १५० वर्षे जुन्या ऐतिहासिक लाकडी रथातून साजरा होणार आहे. या दिवशी भाविकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
प्रशासनाची तयारी
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा, आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इंद्रायणी नदीत पाणी सोडल्यामुळे स्नानासाठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी पालिका आणि पुणे जिल्हा पोलीस यंत्रणा भाविकांना सहकार्य करत आहेत.
वारकऱ्यांचा भक्तिरस भरलेला उत्सव
“खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई,” या अभंगाच्या सुरात संत महात्म्यांच्या भेटींसह भक्तगण टाळ-मृदुंगाच्या गजरात उत्सवाचा आनंद घेत आहेत. भक्तिरसात न्हालेल्या या सोहळ्याने आळंदी नगरी नवचैतन्याने भरून गेली आहे.
वारकरी परंपरेचा गौरव
वारकरी संप्रदायाच्या परंपरेला पुढे नेत, विविध जिल्ह्यातून आलेले कीर्तनकार, प्रवचनकार आणि फडकरी आपले श्रद्धा-भाव माऊलींच्या चरणी अर्पण करत आहेत. या सोहळ्यामुळे आळंदी नगरी पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीतील वारकरी परंपरेच्या महानतेचे दर्शन घडवत आहे.
आळंदी नगरीत सध्या भक्तिमय उत्सवाचा माहोल असून, “चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू” असे म्हणत लाखो भक्त माऊलींच्या चरणी नतमस्तक होत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.