मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), ज्याला अटल सेतू म्हणूनही ओळखले जाते, मुंबई आणि नवी मुंबई यामधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे. समुद्रावर उभारण्यात आलेला हा भारतातील सर्वात लांब पूल असून, याचे काम तब्बल सात वर्षे सुरू होते. कोविडच्या कालावधीत प्रकल्प रखडला असला तरी अखेर जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचा वेळ दोन तासांवरून फक्त 20 मिनिटांवर आला आहे. मात्र, पुलावर आकारण्यात येणाऱ्या टोलच्या अधिक दरांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. यामुळे सुरुवातीला पुलाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
तथापि, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर (टोल) आणखी एका वर्षासाठी स्थिर ठेवण्यात आला आहे. एका प्रवासासाठी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये इतकाच टोल आकारला जाईल, असे ठरविण्यात आले आहे. हा निर्णय व्यापार आणि प्रवासी दोघांसाठीही दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हा पूल 21.8 किमी लांबीचा आहे. पुलाचा 16.5 किलोमीटर भाग पाण्यावर उभारण्यात आला आहे. तर 5.5 किलोमीटर भाग जमिनीवर आहे. अटल सेतुवर सहा मार्गिका आहेत. हा पूल उभारण्यासाठी 17 हजार 840 कोटी रुपये खर्च आला. त्यासाठी 1 लाख 77 हजार 903 मेट्रिक टन स्टील आणि 5 लाख 4 हजार 253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आलं. हा पूल 100 वर्ष टिकेल असा कंपनीचा दावा आहे. कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, लहान ट्रक याच वाहनांना पुलावरुन प्रवास करण्याची परवानगी आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.